Tuesday 8 December 2015

" रणसंग्रामातील फ्रान्स नावाचा योद्धा !"

" रणसंग्रामातील फ्रान्स नावाचा योद्धा !"
पॅरिसवरील अत्यंत भीषण आक्रमणातून केवळ दोनच दिवसांत सावरत फ्रान्सने आय.एस्.आय.एस्. वर केलेल्या धाडसी हवाई आक्रमणांना दाद द्यावी लागेल. फ्रान्सच्या या कृतीला कुणी उपटसुंभ व्यक्ती आततायी ठरवील, कुणी असहिष्णु म्हणेल, तर कुणी पुस्तकी विचारवंत त्यांच्यावर अविचारी कृतीचा ठपका ठेवील. वाघाला घायाळ केले की, तो दुप्पट ताकदीने आक्रमण करतो. फ्रान्सची कृती ही घायाळ वाघापेक्षा वेगळी नाही. अन्यायाचा सूड तात्काळ उगवणे म्हणजे नेमके काय असते, हे फ्रान्सने जगाला दाखवून दिले. अर्थात् अशी कारवाई करणारे फ्रान्स हे पहिले आणि एकमेव राष्ट्र नव्हे. यापूर्वी अमेरिकेनेही अफगाणिस्तान आणि इराकमध्ये सैन्य घुसवून शत्रूचा सूपडा साफ केला आहे. भेद इतकाच की, अफगाणिस्तानमधील आतंकवादी एकेकाळी अमेरिकेनेच पोसलेे होते आणि ते डोईजड झाल्यावर त्यांचा नि:पात केला, तर फ्रान्सला अशी कोणतीही स्वार्थी पार्श्वभूमी नव्हती.
समाजमनाची युद्धभूमी !
फ्रान्सने सिरियातील रक्का या आय.एस्.आय.एस्. च्या अधिपत्याखाली असलेल्या शहरावर आक्रमण केले. फ्रान्सच्या २० बॉम्बनी रक्कातील आय.एस्.आय.एस्.चे प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त केले. फ्रान्सच्या या धडक कारवाईत अमेरिकेचाही सहभाग होता. अन्य राष्ट्रांत जाऊन त्यांच्यावर आक्रमण करणे मूळीच सोपे नसते. फ्रान्सने सिरियावर आक्रमण करून ४८ घंटे उलटले; पण अजूनपर्यंत जगातील एकाही राष्ट्राने फ्रान्सवर टीका केली नाही वा त्याचा निषेधही केला नाही. याऊलट त्यांच्या धाडसाचे कौतुकच झाले. हीच या कारवाईची पोचपावती म्हणावी लागेल. फ्रान्सने सिरियावर आक्रमण करण्यापूर्वी कुणाकडे हात पसरले नाहीत. हा देश या आक्रमणात आय.एस्.आय.एस्.चा सहभाग असल्याचे कुणालाही पुरावे सादर करत बसला नाही. भारतातील काँग्रेसी मानसिकतेची बांडगुळे तेथे नसल्यामुळे कारवाईला कुणीही आडकाठी केली नाही. आपल्याकडे मोठा निर्णय घेण्यापूर्वी वर्षांनुवर्षे पार पाडला जाणारा (निष्फळ) बैठकांचा सोपस्कार फ्रान्सने अवघ्या काही घंट्यांत उरकून लढाऊ विमानांना थेट अवकाशाचा रस्ता दाखवला. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निर्माण केेलेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेचे समुपदेशन घेण्यात या देशाने वेळ दवडला नाही. आक्रमणातील निष्पाप नागरिकांचे छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह आणि त्यांच्या आप्तस्वकियांचा आक्रोश पाहून फ्रान्समधील प्रत्येक नागरिकाच्या मुठी आवळल्या अन् त्यांचे मन युद्धभूमी बनले. तेथील बाणेदार प्रसारमाध्यमांनी भारतीय प्रसारमाध्यमांप्रमाणे रंजक बातम्या देऊन स्वत:चा टी.आर्.पी. न वाढवता आय.एस्.आय.एस्.च्या आक्रमणाला थेट युद्ध संबोधून शासनाच्या कारवाईतील उरलेसुरले अडथळे दूर केले. या बळावरच फ्रान्सला दोनच दिवसांत रक्कावर आक्रमण करणे शक्य झाले. देशाच्या मूळावर उठलेल्या शत्रूविषयी असलेली चीड, त्याला धडा शिकवण्याचा प्रबळ आणि सुस्पष्ट निश्चय अन् त्याला धडक कृतीची जोड, ही त्रिसूत्री फ्रान्सच्या बाहूंना बळ पुरवणारी ठरली.
भारत काय बोध घेणार ?
रक्कावरील आक्रमणाने आय.एस्.आय.एस्.ची किती हानी झाली हे सूत्र एकवेळ गौण आहे; पण फ्रान्सची तत्पर आणि तितकीच बेधडक कृती ही भारतासारख्या आतंकवादग्रस्त राष्ट्रांना अन्यायाचा सूड तत्परतेने कसा उगवावा, याचे दिशादर्शन करणारी ठरली. एरव्ही युरोपीय राष्ट्रे भारतात जिहादी आतंकवादाने घातलेले थैमान खिडकीतून मजा पाहिल्याप्रमाणे पहात होेती; पण पॅरिसवरील भीषण आतकंवादी आक्रमणाने जिहादी आतंकवाद नेमका कसा असतो, हे युरोपने प्रत्यक्ष अनुभवले. मुंबईवरील आक्रमणात पाकचाच हात असल्याचे ढळढळीत पुरावे हाती असूनही भारताने पाकवर आजपर्यंत कारवाई केली नाही. उलट पाकशी मैत्रीचा हात सतत पुढे केला ! षंढपणाचे याहून मोठे दुसरे कुठले उदाहरण असू शकेल ? याच षंढपणाला आपल्याकडे कदाचित् सहिष्णुता म्हणत असावेत ! पाकच्या आतंकवादी आगळीकतेवर कृतीशून्य राहून जगाला आम्ही सहिष्णु आहोत, असे वेळोवेळी सांगणार्या भारतीय राज्यकर्त्यांनी फ्रान्सने केलेल्या आक्रमणानंतर त्यांना जगातील एकाही राष्ट्राने असहिष्णु ठरवले नाही, हे प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजे. याबरोबरच हेही जाणले पाहिजे की, पाकच्या विरोधात भारताला नेहमी सबुरीने घेण्याचा सल्ला देणारी धूर्त अमेरिका फ्रान्सला सिरियावर आक्रमण करण्यासाठी मात्र कृतीशील साहाय्य करते. पॅरिस आणि मुंबई येथील जिहादी आक्रमणांत पुष्कळ समानता होती; पण दोन्ही राष्ट्रांच्या आक्रमणानंतरच्या अमेरीकेच्या भूमिकेत मात्र भूमी-आकाशाएवढा भेद होता. थोडक्यात प्रत्येकाला स्वत:च्या देशातील आतंकवादाविरुद्धची लढाई स्वत:च लढावी लागते, हाच बोध फ्रान्सच्या कृतीतून घेऊन आपण कृतीशील झाले पाहिजे. त्यासाठी आवश्यकता आहे प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आणि समस्त नागरिकांनी एकजूट आणि प्रखर राष्ट्राभिमान दाखवण्याची !

No comments:

Post a Comment